Vitti Dandu

Movie: Movie: Vitti Dandu Director: Ganesh Kadam Producer: Leena Deore

Genre: Patriotic, Adventure, Drama Music: Santosh Mulekar Cast: Dilip Prabhavalkar, Ravindra Mankani, Yatin Karyekar, Ashok Samarth, Mrunal Thakur, Nishant Bhavsar, Gowhar Khan, Shubhankar Atre, Radhika Deore



View image on Twitter
 विटी दांडू हा अस्सल मराठी मातीतला खेळ. शहरांमधून तर आता तो जवळपास संपल्यात जमा आहे. कारण तो खेळायला जागाच उरलेली नाहीय हे एक. आणि दुसरं आजच्या मुलांनी घरी बसलेलं पालकांना चालतं. पण पडून, खरचटून चालत नाही. असो. 'विटी..'मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेली एक नेटकी गोष्ट आहे, आजोबा आणि नातवाची. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ असल्याने यात इंग्रज आहेत. क्रांतीकारक आहेत. इंग्रज, क्रांतीकारक, विटी दांडू खेळण्यात निष्णात असलेला नातू.. हे सगळं वाचताना हा सिनेमा 'लगान'ची वाट धरतोय की काय असं वाटेल एखाद्याला. पण तसं नाही. या सिनेमाची गोष्ट वेगळी आहे. इंटरेस्टिंग बाब म्हणजे ही पटकथा दोन काळांमधून जाते. एक काळ आत्ताचा आणि एक १९४७ चा. अर्थात, ही गुंफण बेमालूम नाही. पण खटकतही नाही. दुसरी गोष्ट यात खेळ आहे. उत्कंठा आहे. पण दोन गटांमध्ये रंगणारा सामना नाही. इथे वळण घेत जाणारी.. कुतूहल वाढवणारी कथा आहे. आजच्या पिढीला 'घडवणाऱ्या' पालकांना चिमटे आहेत. आशयपूर्ण संवाद आहेत. या सर्वांची नीट भट्टी जमल्यामुळे हा 'विटी दांडू'चा खेळ रंगला आहे.

सिनेमाची गोष्ट छोटी आहे. म्हणजे, एका गावात गोविंद आणि त्याचे आजोबा रहातायंत. हे आजोबा इंग्रजांचे कट्टर पाठीराखे आहेत. नातवालाही तशीच शिकवण ते देतायंत. बाकी त्यांचा कसलाही उपद्रव नाही. लहानगा गोविंदही आनंदी आहे. दिवसभर मित्रांसोबत विटी दांडू खेळत उनाडक्या करत फिरणं हा त्याचा उद्योग. पण या खेळात तो तरबेज आहे. सगळं निवांत सुरू आहे. तर असा हा खेळ खेळताना गोविंदाने टोलवलेली विटी अपघाताने तिथे आलेल्या अत्यंत क्रूर इंग्रज अधिकाऱ्याला लागते. त्यानंतर हे प्रकरण पेटतं. वेगळं वळण घेतं.याची पटकथा ​लिहिताना यात कथेला आवश्यक अनेक गोष्टी थोड्या वेगळ्या, मुद्दाम समाविष्ट करण्यात आल्यात. म्हणून या गोष्टीतलं गाव इतर गावांपेक्षा लांब दाखवण्यात आलंय. म्हणजे देशातल्या घडामोडी या गावातल्या लोकांपर्यंत येण्यास आठवडा जातो. त्यामुळे या गावात दळणवळण नाही. अनोळखी लोकांचा राबता नाही. म्हणून निवडलेल्या गावातल्या वस्तीभवती ही गोष्ट फिरवण्यात ​पटकथालेखकाला यश आलं आहे. बरं, ते गाव फारही लहान नाही. म्हणजे इंग्रजांनी तिथे आपली एक कुमक तैनात ठेवली आहे. इंग्रज अधिकाऱ्याला शिक्षेची 'बदली' म्हणून पाठवलं जाणारं, असं हे गाव आहे. देऊळ, तळं, डोंगर, समुद्र असं निसर्गाचं देणं भरभरून दिलेलं हे गाव उभं करण्यात ​कलादिग्दर्शकाचंही कौशल्य पणाला लागलं आहे. या सगळ्या ऑबजेक्ट्समुळे सिनेमा हिरवागार आणि तितकाच देखणा झाला आहे.
 

संवाद, छायांकन या सगळ्या गोष्टी सिनेमाला ​त्याच्या इप्सितापर्यंत नेतात हे खरंच. पण यातली एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, यातल्या खेळाला त्याने लार्जर दॅन लाइफ बनवण्याचा प्रयत्न केलाय. गोष्टीतल्या अनेक टप्प्यांवर 'विटी-दांडू' आपल्याला भेटतात. प्रत्येकवेळी खेळ म्हणून नव्हे. कधी ती आजोबांना द्यायचं पत्र होते. तर कधी शस्त्र. म्हणजे प्रॉप घेऊन नाचताना तो नर्तक तिचा वेगवेगळा उपयोग जसा करतो, तसा तशी ही विटी दांडू आपल्याला भेटतात. यातले गोविंदाने मारलेल्या टोल्यांचं छायांकन नीटस झाल्यामुळे त्यातला जोर वाढतो. शिवाय यातली पटकथा आज आणि कालमध्ये फिरती ठेवल्याने ही गोष्ट 'मोनोटोनस' होत नाही.

छायांकन सतत फिरतं राहिल्यामुळे यातल्या गोष्टीची लय काहीशी संथ असली, तरी ती वेगवान भासते. फक्त अधेमधे यातली पटकथा रेंगाळते. बऱ्याचदा यातल्या गाण्यांमुळेही तसं होतं. जमेची बाब अशी की ही सगळी गाणी टवटवीत झालीत. म्हणून पटकथेत आलेली मरगळ पुढे झटकली जाते. पार्श्वसंगीतही लक्षात राहणारं. यातल्या संवादांमधूनही मजा येते. आजोबा नातवाला समजावताना 'राज्य कुणाचंही असलं तरी गुलामगिरी चुकलीय का?' असं विचारतात त्यावेळी तो सिनेमा आजच्या काळाशी नातं सांगतो. दाजी यांनी इंग्रजांची पाठराखण करताना दिलेल्या कारणांना लॉजिक आहे. तर दुसरीकडे आजच्या काळातले आजोबा नातवाला गावरान माती, खेळ, नदी यांचं महत्त्व सांगू लागतात त्यावेळी आपल्या हातातून निसटणारं काही समोर येतं. अशा अनेक संवादांमधून तो सिनेमा प्रेक्षकाशी 'कनेक्ट' होतो.

सर्वच कलाकारांनी दिग्दर्शकाला साथ दिली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी दाजी उत्तम रंगवला आहे. त्यांना गोविंदाची भूमिका साकारणाऱ्या निशांत भावसार या बालकलाकारानेही चांगली साथ दिलीय. तो आत्मविश्वासाने वावरला आहे. यांसह अशोक समर्थ, यतीन कार्येकर, मृणाल ठाकूर, रवींद्र मंकणी, शुभंकर अत्रे आदी सर्वांनीच नेटकी कामं केलीत.

एकुणात, हिंदी-दाक्षिणात्या सिनेमांची भ्रष्ट नक्कल करण्यापेक्षा मराठी सिनेमाने आपलं वेगळं स्थान निर्माण करायला हवं असं बऱ्याचदा बोललं जातं. गणेश कदम दिग्दर्शित 'विटी दांडू' हा सिनेमा आपल्या नावापासूनच त्याचं मराठीपण अधोरेखित करतो. हां, अधेमधे तो किंचित रेंगाळलेला वाटतो, पण चलता है. नव्या दिग्दर्शकाचा हा पहिला बॉल आहे. त्याने तो उत्तम टोलवलाय.
महाराष्ट्रात असूनही काही अंतरावर असलेल्या एका छोट्या गावात ही गोष्ट घडते. गोविंद आपले आजोबा दाजी यांच्यासह राहातोय. दाजी हे इंग्रजांचे पक्के पाठीराखे. दाजींचा मुलगा आणि सून क्रांतीकारी. गोऱ्यांशी लढताना त्यांना हौतात्म्य आलंय. गोविंदाला दाजींच्या पदरात टाकून ते निघून गेलेत. इकडे गोविंदावर दाजी इंग्रजांची शिकवण ठसवतायत. गोविंदा विटी दांडू खेळण्यात निष्णात आहे.

एकदा विटी दांडू खेळता खेळता गोविंदाने मारलेली विटी तिथे तैनातीत असलेल्या इंग्रज अधिकारी खौफनरला लागते. हलकल्लोळ उडतो. चौकशीला दाजी आणि गोविंदाला बोलावलं जातं. दाजींवर सांशय घेऊन त्यांना तुरुंगात डांबलं जातं. या हत्येबद्दल त्यांना फाशीची शिक्षा होते. पण गावकरी एक होतात. या फाशीविरोधात इंग्रजांचा निषेध होतो. तरीही इंग्रज ऐकत नाहीत. खौफनर जिथे गेला तिथेच दाजींना फाशी द्यायचा निर्णय होतो. फाशीचा दिवस असतो, १७ ऑगस्ट १९४७. भारताला स्वातंत्र्य मिळून तीन दिवस होऊनही या गावाला पत्ता नसतो. पण फाशी देणार तोच तसा निरोप येतो. तरीही इंग्रज अधिकारी फाशीवर कायम असतात. अखेर गोविंदा आपल्या विटी दांडूने इंग्रज अधिकाऱ्यांचा माज उतरवतो.
 
वाचा आणि सांगा, या सिनेमाविषयीच्या गमती-जमतीतरच वाचा
१. वेगवेगळ्या ठिकाणची तब्बल ७० लोकेशन्स एकत्र करून या सिनेमातलं गाव निर्माण करण्यात आलं आहे.
२. यातलं अगडक बगडक.. हे गाणं म्हणत लहान मुलं गावभर फिरतात असा सिक्वेन्स असल्याने हे गाणं शूटच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक लोकेशनवर शूट झालंय.
३. या सिनेमात अशोक समर्थ हा तगडा अभिनेता क्रांतीकारकाच्या भूमिकेत असला, तरी पहिल्यांदाच त्याने यात साडी परिधान केली आहे.
५. अजय देवगण या हिंदी अभिनेत्याने या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून मराठीत पदार्पण केलं आहे.

Synopsis: It is a story about the triumph of the love for the country over attachments for a loved one. This story is about the relationship between grandfather and his grandson.

View image on Twitter

No comments:

Post a Comment