Review of Movie "Shamitabh"


Shamitabh

शमिताभ
कलाकार : अमिताभ बच्चन, धनुष, अक्षरा हसन
निर्माता : सुनील लुल्ला, आर. बल्की, राकेश झुंझुंवाला, अभिषेक बच्चन, एकता कपूर
दिग्दर्शक : आर. बल्की
संगीत : स्वानंद किरकिरे, कौसर ‌मुनीर
वेळ : 153mins
सिनेमा प्रकार : Drama

आर. बालकृष्णन अर्थात आर. बल्की याच्या प्रत्येक सिनेमाची प्रकृती वेगळी असते. मानवी नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर उलगडून दाखवितानाच विचित्र परिस्थितीमुळे आलेली अगतिकता बड्या कॅनव्हासवर रेखाटायलाही त्याला आवडते. प्रेक्षकशरण सिनेमा आणि कलात्मक मूल्यांची मांडणी करणारा सिनेमा या दोन्ही चित्रपटांमधील मध्यममार्ग दाखविण्यावर त्याचा जास्त भर असतो. 'शमिताभ'ही अशीच एक वेगळी प्रकृती आणि नातेसंबंधातील द्वंद्व मांडणारा सिनेमा आहे. वेगळ्या प्रकारचे कथानक, संपूर्ण पडदाभर व्यापून राहिलेला अमिताभ, मध्यंतरानंतर शेवटाकडे जाताना पडद्यावर घडणाऱ्या वेगळ्या घडामोडी आणि चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा शेवट अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला 'शमिताभ' पाहणे हा एक सुखद अनुभव ठरतो. सध्याच्या काळातील प्रेक्षकशरण सिनेमाच्या अतिरेकामध्ये आर. बल्कीचा शमिताभ काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान देतो. अर्थात नेहमीच्या हिंदी सिनेमात असणारी 'जुळवाजुळव' येथेही आहेच; पण चित्रपटाच्या एकत्रित परिणामाध्ये या 'फिल्मी' प्रकाराकडे काहीशी डोळेझाक करता येऊ शकते.

‌शमिताभची गोष्ट आहे इगतपुरीमध्ये राहणाऱ्या दानिश (धनुष) या मराठी मुलाची. जन्मतः वाचा नसलेला दानिश चित्रपटांसाठी वेडा आहे. सातत्याने वेगवेगळे चित्रपट पाहणाऱ्या दानिशला चित्रपटसृष्टीत हिरो म्हणून चमकायचं आहे. इगतपुरी सोडून तो मुंबईला हिरो होण्यासाठी येतो. बोलता येत नसलेल्या दानिशमध्ये अभिनयाचा जबरदस्त सेन्स आहे. मात्र, बोलता येत नसल्यामुळे त्याला निर्माता-दिग्दर्शकांकडून नाकारलं जात आहे. दानिशमधील अभिनयाची चमक इंडस्ट्रीत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणारी अक्षरा (अक्षरा हसन) पाहते. एक माणूस दुसऱ्या माणसाला आवाज देऊ शकतो, असं तंत्रज्ञान फिनलँडमध्ये विकसित झालं असल्याचं तिला डॉक्टर असलेल्या वडिलांकडून समजतं. हे तंत्रज्ञान दानिशसाठी वापरण्याचा ती निर्णय घेते. फिनलँडला जावून ते तंत्रज्ञानही समजावून घेतलं जातं. मात्र, भारतात आल्यावर दानिशला नक्की कोणाचा आवाज द्यायचा याचा शोध सुरू होतो. एका कबरिस्तानामध्ये भणंगासारखा राहणारा, दिवस-रात्र दारूमध्ये आकंठ बुडालेला आणि कोणे एके काळी फिल्म इंडस्ट्रीने खराब आवाजामुळे नाकारलेला अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) अक्षरा आणि दानिशला भेटतो. दानिशसाठी अमिताभचा आवाज वापरायची कल्पना यातून पुढे येते. सुरुवातीला यासाठी नकार देणारा अमिताभ यासाठी परवानगी देतो. दानिशसोबत एखाद्या सावलीसारखा वावरणारा अमिताभ दानिशचा 'बोलविता धनी' होतो. चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी दानिशकडून शमिताभ असे टोपण नाव धारण केले जाते. (दानिश मधील श आणि अमिताभ हा शब्द, यांच्या एकत्रीकरणातून) अक्षरा या साऱ्यासाठी मदत करते. शमिताभ पहिल्या चित्रपटातच सुपरस्टार होतो. मात्र, अर्थात अमिताभविना दानिशचे स्वतंत्र अस्तित्व नसते. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडू लागतात. कोण कोणामुळे श्रेष्ठ आहे, कोणाला कोणामुळे किंमत आहे, असे 'इगो' दुखविणारे प्रकारही होतात. या दोघांच्या द्वंद्वामध्ये एक पत्रकार शमिताभचे कोणालाच माहित नसलेले रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो. या पत्रकाराकडून होणारा संभाव्य धोका लक्षात घेता सत्य काय आहे हे चित्रपटसृष्टीला कळावे अशा हेतूने हा 'आवाजखेळ' जाहीर करण्याचा निर्णय दानिश, ‌अमिताभ आणि अक्षरा घेते; पण....हा पणच जास्त महत्त्वाचा आहे. एकमेकांच्या अस्तित्वाची ही सरमिसळ नक्की कोणत्या स्तरापर्यंत जाते? दानिशने दडविलेलं सत्य चित्रपटसृष्टीला समजतं का? का नियतीच्या मनात काही तरी वेगळंच आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शोकांतिकेनं भरलेला शेवट असणारा 'शमिताभ' पाहायला हवा.शमिताभ या व्यक्तिमत्त्वाचं मूळ बलस्थान असणारा अमिताभचा आवाज हा चित्रपटातील एक अदृश्य असणारा नायकच आहे. संपूर्ण चित्रपट अमिताभच्या धीरगंभीर आवाजाने भरलेल्या संवादांचा आहे. दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं, त्यांचं स्वतःचं असं अस्तित्व, एकमेकांना असणारी एकमेकांची गरज, एक नसला तर दुसऱ्याचं अडून राहणं... असं सारं काही आर. बल्की हळूहळू मांडत जातो. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटाकडे जाताना एखाऱ्या रंगत जाणाऱ्या मैफलीचं समाधान तो आपल्याला देतो. चित्रपटाची विस्ताराने केलेली मांडणी आणि अमिताभ-दानिशचं द्वंद्व रंगविणारी पटकथा चित्रपटाचं बलस्थान आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काही न पटणाऱ्या गोष्टीही दिग्दर्शक दाखवून घेतो. काही कच्चे दुवे निखळून जातात; पण वर म्हटल्याप्रमाणं त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. ७२ व्या वर्षीही ज्या अफाट ऊर्जेच्या साह्याने अमिताभ चित्रपटात वावरतो ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. अमिताभ सिन्हाचा विक्षिप्तपणा, लहरीपणा आणि ऐन मोक्याच्या वेळी दानिशची त्याने केलेली कोंडी याचे दर्शन घडविणारे प्रसंग मस्त जमले आहेत. अमिताभसोबतच्या अनेक प्रसंगांमध्ये धनुष म्हणावासा प्रभाव पाडत नाही. मात्र, तरीही त्याचा अभिनय प्रसंगानुरूप होतो! अक्षरा हसन केवळ दिसतेच छान! संवादफेकीपासून ते अभिनयापर्यंत तिला अजून बरचं काही शिकायचचं आहे, हे वारंवार जाणवत राहतं. आर. बल्कीच्या चित्रपटांचं बलस्थान असणारं इलायराजाचं संगीत इथेही महत्त्वाची भूमिका बजावतं. अमिताभच्या आवाजातील स्वानंद किरकिरेने लिहिलेलं 'पिडलीसी बाते' लक्षात राहतं. पी. सी. श्रीराम या अनुभवी सिनेमॅटोग्राफरने चित्रपटातील अनेक प्रसंगांना दिलेली डार्क शेड आणि आशयातील उदासपणा टिपण्याचा केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे. एकूणात काय तर मनोरंजनाच्या रूढ वाटा न चोखळता शमिताभ अस्तित्वातील सरमिसळीचं द्वंद्व बेमालूमपणे पडद्यावर मांडतो. पडद्यावरचा सिनेमा खोटा असतो हे माहित असूनही आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकाने केलेली योग्य जुळवाजुळव लक्षात येऊनही 'शमिताभ' खरा वाटतो, सच्चा वाटतो. दिग्दर्शक आर. बल्कीचं हेच यश असतं. चित्रपट संपला तरीही मोकळ्या पडद्यावरही अमिताभ आणि अमिताभच व्यापून राहिलेला असतो.

तुम्ही जर हा सिनेमा पाहिला नसेल आणि लवकरच पाहणार असाल, तर इथेच थांबा. पुढे वाचू नका.पुढे वाचलंत तर, कदाचित सिनेमा बघण्याची मजा निघून जाईल.
‌शमिताभची गोष्ट आहे इगतपुरीमध्ये राहणाऱ्या दानिश (धनुष) या मराठी मुलाची. जन्मतः वाचा नसलेला दानिश चित्रपटांसाठी वेडा आहे. सातत्याने वेगवेगळे चित्रपट पाहणाऱ्या दानिशला चित्रपटसृष्टीत हिरो म्हणून चमकायचं आहे. इगतपुरी सोडून तो मुंबईला हिरो होण्यासाठी येतो. बोलता येत नसलेल्या दानिशमध्ये अभिनयाचा जबरदस्त सेन्स आहे. मात्र, बोलता येत नसल्यामुळे त्याला निर्माता-दिग्दर्शकांकडून नाकारलं जात आहे. दानिशमधील अभिनयाची चमक इंडस्ट्रीत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणारी अक्षरा (अक्षरा हसन) पाहते. एक माणूस दुसऱ्या माणसाला आवाज देऊ शकतो, असं तंत्रज्ञान फिनलँडमध्ये विकसित झालं असल्याचं तिला समजतं. हे तंत्रज्ञान दानिशसाठी वापरायचा ती निर्णय घेते. फिनलँडला जावून ते तंत्रज्ञानही समजावून घेतलं जातं. मात्र, भारतात आल्यावर दानिशला नक्की कोणाचा आवाज द्यायचा याचा शोध सुरू होतो. एका कबरिस्तानामध्ये भणंगासारखा राहणारा, दिवस-रात्र दारूमध्ये आकंठ बुडालेला आणि कोणे एके काळी फिल्म इंडस्ट्रीने खराब आवाजामुळे नाकारलेला अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) अक्षरा आणि दानिशला भेटतो. दानिशसाठी अमिताभचा आवाज वापरायची कल्पना यातून पुढे येते. सुरुवातीला यासाठी नकार देणारा अमिताभ यासाठी परवानगी देतो. दानिशसोबत एखाद्या सावलीसारखा वावरणारा अमिताभ दानिशचा 'बोलविता धनी' होतो. चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी तो शमिताभ असे नाव धारण करतो. शमिताभ पहिल्या चित्रपटातच सुपरस्टार होतो. मात्र, अर्थात अमिताभविना दानिशचे स्वतंत्र अस्तित्व नसते. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडू लागतात. कोण कोणामुळे श्रेष्ठ आहे, कोणाला कोणामुळ किंमत आहे असे 'इगो' दुखविणारे प्रकारही होतात. या दोघांच्या द्वंद्वामध्ये एक पत्रकार शमिताभचे कोणालाच माहित नसलेले रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो. सत्य काय आहे हे चित्रपटसृष्टीला कळावे अशा हेतूने हा आवाजखेळ जाहीर करण्याचा निर्णय दानिश, ‌अमिताभ आणि अक्षरा घेते. मात्र, या कार्यक्रमाला जात असतानाच दानिश आणि अमिताभच्या गाडीला अपघात होतो. यामध्ये दानिशचा मृत्यू होतो आणि अमिताभची वाचा जाते. एका विचित्र वळणावर येऊन चित्रपट संपतो. 
 
वाचा आणि सांगा, या सिनेमाविषयीच्या गमती-जमतीतरच वाचा
- चित्रपटाचं चित्रिकरण महाराष्ट्रात झालं आहे. ८० च्या दशकातील सेटवर उभारलेलं इगतपुरी लक्षात राहणारं आहे.
- दिग्दर्शक आर. बल्की ने या चित्रपटापूर्वी चिनी कम आणि पा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
- अक्षरा हसनचा हा पहिलाच चित्रपट आहे.
 



No comments:

Post a Comment