कान तृप्त करणारी गाणी

तुम्ही म्हणाल की, आजचा सलग तिसरा लेखही एका विस्मृतीत गेलेल्या गीतकाराबद्दलच आहे …..
पण जेव्हा अनिलदांच्या लेखात ” तराना ” आणि ” अनोखा प्यार ” या चित्रपटांचा उल्लेख आला, तेव्हाच ठरवलं होत की, कैफ इरफानी, झिया सरहदी आणि डी. एन. मधोक यांचे लेख सलगपणे द्यायचे ….
कारण ह्या तीनही गीतकारांच्या गाण्यांनी लताला त्या सुरुवातीच्या काळात जम बसवायला खूप मदत केली आहे ….

लाहोरमध्ये रेल्वेत नोकरीला असलेले डी. एन. मधोक यांना चित्रपटांची ओढ होती आणि हीच ओढ त्यांना सिनेसृष्टीच माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये खेचून घेवून आली.
त्यांनी अनेक सुरस गीते तर लिहिलीच पण, अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहून त्याचं दिग्दर्शनही केले आहे.

सैगलचं एक अतिशय सुमधुर गीत ” मधुकर शाम हमारे चोर ” मुळे मला प्रथम डी. एन. मधोक हे नाव कळलं ….
“तानसेन ” मधलं सैगलने गायलेलं अजरामर गीत ” झगमग झगमग दिया जलाओ ” आणि डी.एन. मधोक यांनीच लिहिलेलं आहे.
त्याचं आणखीन एक मला आवडणार गाणं म्हणजे ” घटा घनघोर घोर मोर मचावे शोर मोरे सज्जन आजा”  खुर्शीद या त्याकाळच्या सुप्रसिद्ध गायिकेने गायलेलं हे अतिशय गाजलेलं गाणं.

त्यांची गाणी एकेकाळी इतकी लोकप्रिय होती की, चाळीसच्या दशकात ” महाकवी मधोक ” ह्या नावाने ते ओळखले जायचे.
हिंदी सिने संगीताच्या अगदी सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या पिढीतल्या तीन पहिल्या गीतकारांपैकी ते एक होते ….
दुसरे दोन गीतकार होते कवी प्रदीप आणि केदार शर्मा …

सुप्रसिद्ध संगीतकार नौशादला हिंदी सिनेसृष्टीत सर्वप्रथम आणण्याचं श्रेय डी.एन. मधोक यांनाच जातं.
दोघांनी मिळून केलेला १९४३ सालातला ” रतन ” त्याकाळचा सुपर हिट ठरलेला चित्रपट.

लता सर्वप्रथम त्यांच्यासाठी १९५० मध्ये आलेल्या ” अनमोल रतन ” मध्ये गायली ….. तराना, सैय्या, बाराती, उटपटांग, रसिया, राजारानीमध्ये देखील डी.एन. मधोकनी लतासाठी अनेक सुरेल गाणी लिहिली आहेत ….
१ ) नुकतीच लागलेली तारुण्याची चाहूल…. हृदयात होणारी गोड कालवाकालव आणि मनात फुललेला वसंत ….
पाणी भरायला म्हणून विहिरीवर आलीये खरी, पण जीव कुठेय थाऱ्यावर ?
कुणाला तरी शोधणारी, काही तरी लपवणारी, इथे तिथे भिरभिरणारी चोरटी चंचल नजर ….
आपल्यात होत असलेले हे बदल कुण्णाकुणाला कळू नये म्हणून काळजी घ्यावी तर तेवढ्यात पपीहाने पीहू पीहू करून छेड काढावी आणि अख्ख्या जगाला ओरडून ओरडून आपली मनस्थिती सांगावी ….
अशावेळी कुठे लपू आणि काय करू ?
जीव नको नको होवून जातो अगदी

” हाये कोई कहदे पपिहे से जाके
बैरी काहे छेडे पीहू पीहू गाके
ऋत सावन की मुख पर आये क्यूँ
झुमती घटा में कोई आग लगाये क्यूँ
मेरे पास आये वो तो , काहु समझा के
बैरी काहे छेडे पीहू पीहू गाके ” ….

अभिनेत्री चांद उस्मानी वर चित्रित झालेलं हे “बाराती” मधलं गोड गाणं लिहिलंय डी.एन. मधोक यांनी आणि संगीत दिलय रोशन यांनी.

२) हा वर जो पपीहा छेड काढत होता ना तो उगीचच नाही बर का ?
त्याला सगळं माहीत होतं …. तिचं त्याच्यात गुंतलेलं मन ओळखण्यात पटाईत आहे तो …..
तिला भेटलाय तिच्या स्वप्नातला राजकुमार …..
एकमेकांना लपून छपून भेटण्यातलं आकर्षण आणि कुणाला आपलं हे चोरून भेटणं कळू नये म्हणून ती घेत असलेली काळजी
किती सावधपणे यावं लागत तिला त्याच्या एका भेटीसाठी
आणि तो ? तो एकदम बेफिकीर …. त्याला मात्र तिच्या या मेहेनतीचं काहीच वाटत नाहीये. तिची छेड काढून तिला सतावत बसला आहे …
पण आपली नायिका मधुसुद्धा काही लेची पेची नाहीये
” प्रियकर असलास म्हणून काय झालं ? एवढा आटापिटा करून तूला भेटायला येतेय मी, विसरलास तर खबरदार ” अशी प्रेमळ पण सज्जड धमकी देतेय ती …
” यूँ छुप-छुप के चुपके-चुपके मेरा आना
याद रहे भूल न जाना
हमको सताओगे बड़ा दुख पाओगे
लग जायेगी मेरी हाय
हाय सताये हाय जलाये
कहीं भी जाओगे कल ना आये
हँसेगा सारा ज़माना
याद रहे भूल न जाना
यूँ छुप-छुप के चुपके-चुपके मेरा आना ” ….

” तराना ” मधलं हे माझं आवडत गीत …. लताच्या लाडिक तक्रारीचा आणि प्रेमळ धमकीचा दिलीपकुमारवर काही असर पडला असेल अस मात्र मला अजिबात वाटत नाहीये.

३) प्रेम एक नैसर्गिक सहज सुंदर अनुभूती ….

सर्वच जण करतात प्रेम …. अहं करत नाहीत तर प्रेमात पडतात , कारण प्रेम करणं आपल्या हातात नसतंच मुळी ….
पण प्रेमात पडणं जेवढ सहज न तेवढंच ते निभावणं कठीण. ज्याला आपण विश्वासाने आपलं सर्वस्व समर्पण करतो तो कधीकाळी आपल्यापासून दूर गेला तर ?
ज्याच्या सहवासात अनेक रात्री जागवल्या, फुलवल्या …. आता मात्र एक रात्रही त्याच्याविना जाता जात नाही.
जो अंधार तो असताना हवाहवासा वाटायचा तोच आता जीवाचा थरकाप उडवतो, एकाकी पाहून गिळू पाहतो. चुकीच्या माणसावर जीव जडवला तर त्रास तर होणारच ना ?
तिची निवड खरंच चुकली होती का? की तो ही तिच्यासारखाच नियतीच्या हातचा शिकार बनला होता ?
डोळ्यात विफलतेचे अश्रू आणि साथीला आहेत त्याच्या कासावीस करणाऱ्या आठवणी. ह्या काळ्याकुट्ट रात्री त्यांचीच काय की सोबत आहे ज्या धीर देत आहेत.
पण प्रेमात सफलते पेक्षा विफलातच जास्त मिळते …..

” काली काली रात रे दिल बडा सताये
तेरी याद आये तेरी याद आये
झूटों से प्यार किया है क्या किया
सारे जहाँ का दुःख ले लिया
अब रो रो सावन जाये
तेरी याद आये तेरी याद आये ” …..

” सैय्या ” मधलं परत एकदा मधुबाला वरच चित्रित झालेलं हे आर्त विरहगीत … संगीतकार आहेत सज्जाद .

४) आधी त्याच्या विरहात रात्र जाता जात नव्हती पण आता मात्र दिवस कंठण देखील जड जावू लागलंय. कशावरच आता वासना उरली नाहीये.
उध्वस्त झालेल्या मनाला दिवस काय आणि रात्र काय, दोन्ही सारखेच.
जेव्हा प्रिय व्यक्ती जवळ नसते ना तेव्हा आयुष्याचे संदर्भच बदलतात …
ज्या चंद्र ताऱ्यांच्या दुधाळ चांदण्याची जादू दोघांनी मनसोक्त लुटली तेच आकाशीचे चंद्र तारे आज मात्र निस्तेज वाटत आहेत.
आयुष्याचा सूरच जिथे बेसुरा लागला आहे तिथे आता जगून तरी काय करायचं ?

” न तो दिन ही दिन वो रहे मेरे
न वो रात रात मेरी रही
न तो चाँद पे वो निखार है
न वो चाँदनी में बहार है
न वो जोश पासी-ए-इश्क़ में
न वो जिस्म ही में तड़प रही
न तो दिन ही दिन वो रहे मेरे … ”

” दर्द ए दिल ” मधलं आर. सी. बोराल यांनी संगीत दिलेलं आणि डी.एन. मधोक यांनी लिहिलेलं हे करुण गीत ऐकताना मन नेहमी खिन्न होतं.

५) आणि जेव्हा अशाच एका रात्री दोघेही एकत्र असतात तेव्हा ?
विरहात असताना तो नाही म्हणून तिला झोप येत नाही तर एकत्र असताना तिला पाहून त्याची झोप कुठल्याकुठे पळाली आहे.
तिने त्याला झोपवायचा कितीही प्रयत्न केला तरी समोर असं स्वर्गीय सौंदर्य असताना कोण वेडा झोपेल ? त्याच्या बेईमान डोळ्यांना ती सतत समोर हवी आहे

” बेइमान तोरे नैनवा नींदिया ना आये
टुक सोये जा की रात कहीं भागी न जाये
बेइमान तोरे नैनवा नींदिया ना आये ” …..

ती म्हणतेय ” बैठी हूँ यहीं मैं ना घबरा ”
आता तिला कोण समजावणार की बाई गं, तू जवळ बसलीयेस ना म्हणूनच त्याची झोप उडालीये, संपूर्ण रात्रभर तुझ्या आरस्पानी सौंदर्यात त्याला नहायचंय ….

” ले मूंद ले अँखियाँ तनिक ज़रा
बैठी हूँ यहीं मैं ना घबरा
रात जाये पलक तोसे झपकी न जाये ” ….

त्याच्या पेंगुळलेल्या नजरेतील अनोखे भाव पाहून खरं तर तीच संभ्रमात पडली आहे आणि तिचा उडालेला गोंधळ पाहून तो मात्र मजेत हलकेच गालात हसतोय …

” आधे सोये आधे जागे
साँची कहूँ मोहे यूँ लागे
जैसे मन में भरम एक आये एक जाये ” ….

डी.एन. मधोक याचं ” तराना ” मधलं अनिल विश्वास यांनी संगीत दिलेलं आणि दिलीपकुमार आणि मधुबालावर चित्रित हे सदाबहार गीत ….
===========

ज्या चित्रपटामुळे लता आणि अनिलदा सर्वप्रथम एकत्र आले तो होता ” अनोखा प्यार ”

“अनोखा प्यार ” त्या काळी गाण्यांमुळे प्रचंड गाजला होता आणि त्यातील अत्यंत लोकप्रिय झालेली, ” इक दिल का लगाना बाकी था ” आणि ” याद रखना चांद तारो ” जी लताने गायली आहेत , ती दोन्ही गाणी लिहिणारे गीतकार होते झिया सरहदी ……

अनेक सुरेख गाण्यांचे रचनाकार झिया सरहदी, भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले आणि आपलं दुर्दैव की, लताला त्यांची मोजकीच गाणी गाता आली.
” अनोखा प्यार “, ” आवाज ” आणि ” बडी माँ ” अशा जेमतेम तीनच चित्रपटात लताची जिया सरहदीनी लिहिलेली गाणी ऐकायला मिळतात.


ते अनेक चित्रपटांच्या पटकथा देखील लिहित असत…. त्यांनी पटकथा लिहिलेला असाच एक चित्रपट १९४५ साली आलेला ” बडी मां ”
या चित्रपटाच वैशिष्ट्य म्हणजे नूरजहा, लता मंगेशकर आणि आशा भोसले या तीनही गायिकांनी भूमिका केलेला हा एकमेव चित्रपट.
” मदर इंडिया ” या आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या चित्रपटाचे देखील ते सहाय्यक पटकथाकार होते.
” बैजू बावरा ” चित्रपटाचेही कथाकार झिया सरहदी च होते. .




आज मी जी पाच गाणी निवडली आहेत त्यात लताची ४ सोलो गाणी आहेत आणि एक गाणं लता आणि इरा नागरथ यांच्या आवाजातलं आहे.

१) प्रेमाची भाषा खरंतर किती आगळी असते, न बोलताही नजरेतून कळते….
मग माझ्या डोळ्यातले भाव, त्याच्याविषयी वाटणारं प्रेम काळजी त्याला का नाही कळत? नजरेतील आर्जव त्याला दिसत नाही का?  मनातली घालमेलही कळत नाही का त्याला ? …
जी तळमळ इथे आहे तीच तिथे का नाही ?
प्रियकराबद्दलची बद्दलची ओढ कितीही उत्कट असली न तरी एकतर्फी असून चालत नाही नाहीतर पदरी फक्त निराशा पडते….

” भोला भाला री मोरा बलमा न जाने,
भोला भाला री मोरा बाबू न समझे,
प्रीत भरे मन के इशारे ”

हाकेच्या अंतरावर हिचा प्रियकर आहे खरा …. पण हाय रे किस्मत !! तिची हाक त्याला ऐकूच येत नाहीये ….
तिला दुखी पाहून त्याला वाईट तर वाटतंय पण त्या दुःखाच कारण तोच आहे हे मात्र काही केल्या कळत नाहीये …..
कधीतरी त्याला तिच्या दुःखाच खरं कारण कळेल का ?
तिच्या हाकेला तो साद देईल का ?

” रोऊँ तो समझे मोहे और कोई दुःख है,
झूटी हँसी देख पिया माने मोरी सुख है,
चैन न पाये जिया कैसे बताऊँ पिया,
जीती हूँ तेरे सहारे ”

नलिनी जयवंत वर चित्रित हे ” अनोखा प्यार ” मधलं एक सुरेल गीत .

२) प्रेमी फक्त दोनच गोष्टी करतात ….. तो असताना त्याच्याबरोबर वेळ घालवतात आणि तो नसला की, त्याच्या आठवणीत अश्रू ढाळतात.

प्रेमात असताना सर्वात सुखी काळ तो असतो जेव्हा दोघ एकत्र असतात …. एकत्र असताना एकमेकांच्या नजरेत हरवणं आणि मिठीत सामावणं ….
आणि एकत्र नसताना एकमेकांच्या आठवणीत डोळे टिपत त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणं ….

” इक दिल का लगाना बाक़ी था,
सो दिल भी लगाके देख लिया,
तक़दीर का रोना कम न हुआ ,
आँसू भी बहाके देख लिया ”

त्याला विसरायचा प्रयत्न करत करत परत त्याच्याच आठवणीत रमून ते पूर्वीच हरवलेलं सुख शोधणं ….
कारण त्याला विसरायचं नसतंच मुळी …. त्याच्या आठवणी, मग त्या कितीही जीवघेण्या का असेनात , त्याच तर आता एकमेव आधार असतात जगण्याच्या.
पण कितीही उपाय केले तरी हे ‘ दिल ‘ त्याच्याशिवाय कुठेही रमत नाही ….

” इक बार भुलाना चाहा था,
सौ बार वो हमको याद आया,
इक भूलनेवाले को हमने ,
सौ बार भुलाके देख लिया ”

” अनोखा प्यार मधलं हे लताच्या आवाजातला माझ खूप आवडतं गाणं ….
हेच गाणं मीना कपूर आणि मुकेशने देखील गायलं आहे …

३) परत तीच तडफड ….

एखाद्यावर जीव ओवाळून टाकावा पण समोरच्याला त्याचा पत्ताच नसावा …..
काय कमी आहे तिच्या प्रेमात? तिच असं मूक जळणं, त्याच्या एका प्रेमाच्या कटाक्षासाठी ताटकळणं त्याला कधीच कळणार नाहीये का ?
तिचा मूक आक्रोश तिच्या हृदयात कायम वास्तव्याला असूनही तो नाहीच जाणू शकला ….

” ऐ दिल मेरी वफ़ा में कोई असर नहीं है,
मैं मर रही हूँ जिन पर उनको खबर नहीं है,
मेरे ही दिल में रह कर मुझ पर नज़र नहीं है ”

तिच्या नजरेत राहूनही तो तिच्यापासून कितीतरी कोस दूर आहे ….
मनाच्या तारा दोन्हीकडून जुळल्याच नाहीत. तिची ही केविलवाणी अवस्था कोण सांगणार आता त्याला ?
ही तगमग कशी पोहोचेल त्याच्यापर्यंत ?

” दिल लेके अब कहाँ है दिल के जलाने वाले,
आँखों से दूर क्यों है दिल में समाने वाले,
कोई उन्हें बताएं मुझको खबर नहीं है ”

लता आणि इरा नागरथ यांच्या आवाजातल हे एक आर्त गाणं ” अनोखा प्यार ” मधलं

४) डोळ्यात असंख्य स्वप्न घेवून प्रेमाच्या शोधात असणारे आपण सगळेच प्रवासी ह्या प्रेमाच्या मार्गावरचे …. जोडीदार मनाजोगा मिळाला की ह्या स्वप्नांना पंख फुटतात …. त्याच्याबरोबर एका रम्य दुनियेत …..

पण जर मनाजोगा प्रियकर नाही मिळाला तर ?
स्वप्न साकार नाहीच झाली तर ?
हृदयातील कोमल भावनांचा चक्काचूर होतो…. सगळे अरमान लुटले जातात

” जीवन सपना टूट गया
एक मुसाफ़िर आया, आके
दिल की दुनिया लूट गया ”

कुणाच्या तरी प्रतीक्षेत असताना एखादा मोरपंखी आसरा मिळता मिळता हातून नकळतपणे निसटावा आणि आपण असहाय्यपणे आसवे गाळावीत …..
आतल्याआत जळत राहायचं आणि आपल्या वेदना जगापासून लपवायच्या ….. हेच ते प्रेम करणाऱ्याचं प्राक्तन असत ….

” मन नगरी मेरी सूनी पडी थी,
आशा के द्वारे पे कब से खड़ी थी,
हाथ में पी का आँचल सजनी,
आते आते छुट गया
जीवन सपना टूट गया ” …




५) पण एक गोष्ट कायम सोबत असते आपल्या ….. आपली किस्मत …… अगदी सगळ्यांनी साथ सोडली तरी किस्मत कधीच दगा देत नाही. तिचे नीती नियम मात्र सगळेच अजब. प्रेमात पडलेल्याचा लगामही किस्मतच्याच हातात असतो. किस्मत तो लगाम कधी कसा ओढेल काहीच सांगता येत नाही. सारं काही मानाजोगतं असूनही कशी कुठे आणि कधी किस्मत रुसून बसेल सांगता येत नाही …. आयुष्यात सारी सुख लाभून सुद्धा विरहामुळे येणारी तनहाई

” भीड़ ही भीड़ है, तनहाई ही तनहाई है
उल्फ़त के हैं काम निराले
क़िस्मत में न हो तो साथी
उल्फ़त के हैं ” …

अशावेळी सगळी स्वप्न, सगळ्या आशा धुळीला मिळतात. असंच चालू राहणार का हे नियतीचं चक्र ? कोणीतरी कायम नियतीच्या हातंच शिकार होतच राहणार ….. आज मी तर उद्या तू तर परवा आणखीन कुणीतरी ….प्रेमात दुसरा कोणताच पर्याय नाहीये का ?

” उम्मीदें भी हैं इक सपना
आँसू हैं तो बह जाते हैं
आवाज़ उठी है दिल से
बेदर्द ज़माने सुन ले
कल तू भी उजड़ जायेगा
हम आज उजड़ जाते हैं
उल्फ़त के हैं ” ..

” आवाज ” चित्रपटातल हे गाणं …. शब्द साधेच पण परिणामकारक …. पाकिस्तानात जावून जिया सरहदीची स्थिती देखील याहून फारशी वेगळी झाली नव्हती ….. त्यांच्यासारख्या स्वतंत्र मानसिकता असलेल्या व्यक्तीला तिथल्या कर्मठ वातावरणाशी जुळवून घेता आले नाही …. पाकिस्तानी आर्मी ने त्यांना शेवटच्या काळात त्यांना house arrest मध्ये ठेवले होते .

================
” कैफ इरफानी ” काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला एक गीतकार
अनिलदांच्या लेखात आपण ” तराना ” चित्रपटाबद्दल वाचलं ….
” तराना ” चं संगीत जरी अनिल विश्वास याचं असलं तरी ह्या चित्रपटात कैफ इरफानी, डी एन मधोक आणि प्रेम धवन अशा तीन गीतकारांच्या रचना आहेत .
आज अशी सुरेल गीते रचणारे अनेक गीतकार विस्मृतीत गेलेले आहेत ….. त्यांची नावं देखील कुणाला आठवत नाहीत …. गाणीही अनेकांना माहित नसतील आणि म्हणूनच लताच्या या सूर सफरीत अशाच अनेक गुणी गीतकार संगीतकारांवर लिहायच ठरवलं आहे ….

ह्यांची लोकप्रिय गाजलेली गाणी जरी खूप कमी आणि मोजकीच असली तरी त्यांचं लता ला घडविण्यातलं योगदान अमुल्य आहे . त्यांच्या उल्लेखा शिवाय ही सफर अधुरीच राहील आणि म्हणूनच या सफरीत कैफ इरफानी यांचा उल्लेख अटळ आहे ….. तराना साठी ” वापस ले ले ये जवानी ” हे लताने म्हटलेलं आणि ” एक मै हुं एक मेरी बेकसी की शाम है ” हे तलत ने गायलेलं अशी २ अप्रतिम विरहगीते कैफ इरफांनी यांनी लिहिली आहेत .

त्यांनी सर्वात आधी गीतरचना केली ती १९४९ साली आलेल्या ” नाच ” ह्या चित्रपटासाठी . पण कैफ इरफानीना खरी प्रसिद्धी मिळवून दिली १९५० मध्ये आलेल्या ” मल्हार ” ह्या चित्रपटातील गीतांनी ….
यातील एकूण एक गीत गाजले .
कैफ इरफानी यांनी मल्हार साठी लिहिलेली ” दिल तुझे दिया था रखने को ” , ” मुहब्बत की किस्मत बनाने से पहले “, ” आणि ” कहा हो तुम जरा आवाज दो ” तीनही गीते त्याकाळी अफाट लोकप्रिय झाली .
मल्हार मध्येही ३ वेगवेगळे गीतकार आहेत . पण तेव्हापासून ” मल्हार ” चे संगीतकार रोशन आणि कैफ इरफानी यांची जोडी जमली …. आणि रागरंग , आगोश , शिशम , या चित्रपटात दोघांनी काही सुरेख गाणी दिली .




१) जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपलं अख्ख जग आपला पिया असतो …. सार काही त्याच्यासाठीच तर असत ….
आपलं हसणं , आपलं रडणं , आपलं उठणं , आपलं बसणं सार सारा फक्त त्याच्या एका इशाऱ्यावर , त्याच्या एका प्रेमळ नजरेसाठी …..
आणि जेव्हा तो प्रेमाचा एक कटाक्ष टाकतो न आपल्याकडे तेव्हा तर ते पूर्ण जग जिंकल्याचा आनंद होतो …. सार जग जणू फेर धरून आपल्या भोवती नाचत आहे असं वाटतं ही ओढ , ही साथ अशीच रहावी , हा जो प्रेमाचा वसंत फुलला आहे तो असाच कायम बहरलेला असावा

” नैनों में प्यार डोले, दिल का क़रार डोले
तुम जब देखो पिया, मेरा संसार डोले …..
तुमने बसाया मुझे अपनी निगाहों में
फूल खिलाये मेरी प्रीत की राहों में
अंखियों में प्यार भरा नया इकरार डोले
तुम जब देखो पिया मेरा संसार डोले ” ……

” शेरू ” या चित्रपटातल कैफ इरफानी यांनी लिहिलेलं आणि मदन मोहन यांनी संगीत दिलेलं हे एक हलकं फुलकं गीत आणि गाण्याचे बोलही किती गोड ….
४० च्या दशकातील मदन मोहनच्या संगीतातही किती वेगळेपण जाणवतंय नाही ?
२) पण ही प्रीत , ही साथ , कायम रहात नाही. कारण प्रेमाच्या नशिबातच मुळी दुरावा लिहिलेला असतो
तो सर्वेसर्वा ” जमाने का मालिक ” त्याला कस बर हे करवल असेल ?
खरंच इतका निष्ठुर आहे का तो ? दोन आकंठ प्रेमात बुडालेल्या जीवांना अस दूर करताना त्याचेही डोळे नक्कीच पाणावले असतील …..
जर त्याने कधी कुणावर जीव लावला असेल तर ताटातूट झालेल्या प्रेमिकांची हालत काय होत असेल हे त्याला कळत नसेल का ? …..
की मग नशिबापुढे तो मालिकही शेवटी आपल्यासारखाच असहाय्य ठरतो ?
सर्वांच्या हृदयात प्रेमाची हळुवार भावना जागवून मग ती एका क्षणात उध्वस्त करताना , करावी लागताना , तो नक्कीच रडला असणार ….

” मुहब्बत की क़िसमत बनाने से पहले
ज़माने के मालिक तू रोया तो होगा ……
तुझे भी किसी से अगर प्यार होता
हमारी तरह तू भी क़िसमत को रोता
हँसी मेरे ग़म की उड़ाने से पहले
ज़माने के मालिक तू रोया तो होगा ” …

१९५१ साली आलेल्या ” मल्हार ” मधलं रोशन ने संगीत दिलेलं हे सदाबहार गीत …. यातील कैफ इरफानींचे शब्द ऐकणाऱ्याला रडवल्याशिवाय रहात नाहीत ….
३) एखादी छोटीशी जरी नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात आली की खूप काही बदल घडतात …… कधी हवेहवेसे तरी कधी नको असणारे
पण कधीतरी असा एखादा बदल येतो आपल्या आयुष्यात की तो आयुष्याच वळणच बदलून टाकतो ……. बरबाद करून टाकतो ……
प्रेम …… कुणाच्या आयुष्यात कसं येईल सांगता येतं का कधी ?
प्रेम , कधी एखाद्याच आयुष्य रंगीबेरंगी करत तर कधी तेच प्रेम कुणाचं जग उध्वस्त करत ……
जरा कुठे जीवनात हास्याची चाहूल लागतेय तोच अश्रू येतात ….. कायमचे साथ द्यायला आणि आपल्यावर फुलांची उधळण व्हावी अशी भाबडी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र वाट्याला येते अश्रूंनी भरलेली रक्तबंबाळ करणारी काटेरी वाट

” बड़ी बरबादियाँ ले कर मेरी दुनियाँ में प्यार आया
हँसी एक बार आयी है, तो रोना लाख बार आया
भरा अश्कों से वो दामन जिसे फूलों से भर्ना था
मुझे इस बेवफ़ा दुनियाँ पे रोना बार बार आया
बड़ी बरबादियाँ ले कर मेरी दुनियाँ में प्यार आया
बड़ी बरबादियाँ ले कर ” …

ऐकणाऱ्याला विव्हल करणार हे कैफ इरफानी याचं एक अप्रतिम गीत …. ” धून ” या चित्रपटातल …. याचंही संगीत मदन मोहन नेच दिलेलं आहे …
४) हळूहळू बालपण संपत आणि जवानी हळूच डोकावू लागते … नेहेमीचच जग , नेहेमीचेच लोक , आजूबाजूचा परिसरही तोच …. पण तरीही सगळंच वेगळं …. त्यातून आपल्या प्रिय व्यक्तीची अशावेळी साथ असेल तर मग काही विचारायलाच नको …. सार विश्वच बदलतं आपलं , प्रत्येक गोष्टीचा अर्थ नव्याने कळायला लागतो ….
त्याच्याबरोबर हिंदोळ्यावर झुलत असतो आपण सुखस्वप्न पहात …. आणि अशावेळी ही साथ जर अचानक नाहीशी झाली तर ? आपला प्रियकर आपल्यापासून दूर गेला तर ?
काय करायचं मग ही जवानी घेवून ? त्यापेक्षा ती नसलेलीच बरी ….. आपण जवानी यायच्या आधी जास्त सुखी होतो …..
जर नशिबात प्रेम असत तर प्रेमाचा पराजय झालाच नसता ….. कदाचित त्या ” वरच्यानेच ” काहीतरी ठरवून प्रेमिकांची ताटातूट केलेली आहे …. मग अशावेळी नुसता प्रियकर हिरावून घेण्यापेक्षा जवानी देखील परत घेतली तर जगणं थोड तरी सुसह्य होईल …… खरच होईल का ?

” वापस ले-ले ये जवानी ओ जवानी देनेवाले
रास न आई प्यार-कहानी
हो प्यार-कहानी देनेवाले
वापस ले-ले ये जवानी
प्यार तुझे मंज़ूर जो होता
ठेस न लगती दिल ना रोता
तूने कुछ तो सोचा होता ज़िंदगानी देनेवाले
वापस ले-ले ये जवानी ”

” तराना ” मधलं मधुबाला वर चित्रित केलेल हे गीत …. मधुबालाच्या नाजूक, कोवळ्या चेहऱ्यावरचे दुखी भाव आणि तेवढेच घायाळ करणारे हे शब्द ….. कुणाचेही डोळे पाणावतील ….

५ )पण प्रेमात वाट्याला काहीही येवो हे आयुष्य जगायचं असत …..
कारण आयुष्य म्हणजे एक वाहणारा किनारा आहे ….. तो वाहतच राहणार …. कुठेही कुणाही साठी न थांबता तो थांबला तो संपला ….. त्याला तिथेच सोडून ही वहाणारी जिंदगी पुढे जात असते ….
आणि म्हणूनच जो जगतो त्याचंच हे जग आहे …. कुठेही न थांबता काळाबरोबर वहात जाण , त्याच्याच गतीने त्याच्याच सुरात सूर मिळवण म्हणजेच जिंदगी ……
आयुष्य जे काही देईल ते हसत खेळत स्विकारा आणि मग पहा ….. तुम्हाला आयुष्य परत कसं नव्याने कळत ते ….

” किस की नज़र का मस्त इशारा है ज़िंदगी
किस आसमां का टूटा सितारा है ज़िंदगी ….
क्या कश्तियाँ रहेंगी ये लहरों से होशियार,
उनके हैं जिनसे लाख उम्मीदों के बेक़रार
दरिया का एक बहता किनारा है ज़िंदगी
किस आस्माँ का टूटा सितारा है ज़िंदगी ” …..

” रागरंग ” मधील रोशन यांनी संगीत दिलेलं कैफ इरफानी याचं हे गीत , किती सहज ओघवत्या शब्दात आयुष्याचा अर्थ सांगितला आहे यात …

छोटे बाबू ” मधलं तलत ने गायलेलं सदाबहार गीत ” दो दिन की मुहब्बत में हमने कुछ खोया है कुछ पाया है ”
” धून ” मधलं ” तारे गिन गिन बीती सारी रात ”
” नाच ” मधलं सुरेय्याच ” ऐ दिल किसे सुनाऊ ये दुख भरा फसाना ”
” सरदार ” चित्रपटातल ” प्यार की ये तल्खीया , जो न सह सकू तो क्या करू ” हे आज खूप दुर्मिळ असलेलं गीतही कैफ इरफानी यांनीच लिहिलेलं आहे.




प्रभावी आणि तरीही सामन्यांना आवडेल अशी साधी सोप्पी शब्दरचना हे त्याचं वैशिष्ट्य होत …..
पण दुर्दैव असं की तराना , शेरू , नाता , धून , छोटे बाबू , लाडला, अनुराग अशा जवळ जवळ ५० च्या वर चित्रपटांची काही अप्रतिम गीते लिहिणाऱ्या ह्या गीतकाराची आज फारच कमी गाणी रसिकांना आठवतात ….
===============
” सिने में सुलगते है अरमान
आंखो में उदासी छाई
ऐ प्यार तेरी दुनिया से हमे
तकदीर कहा ले आई है ”

काही गाणी ही एखाद्याची identity बनतात ….. वरच गाणं ऐकताना जरी डोळ्यासमोर मधुबाला आणि दिलीप कुमार आले तरी, हे गाणं सर्वार्थाने अनिल विश्वास यांची ओळख आहे असं मला तरी वाटत …..
या एका गाण्यावरून ह्या संवेदनशील माणसाचं विलक्षण सामर्थ्य सहज लक्षात येतं …. पण फक्त वरचं गाणं म्हणजेच अनिल विश्वास नव्हेत. अनिल विश्वास ही माझ्या मते एक व्यक्ती नसून एक संस्था आहे …. जिने अनेक दिग्गजांना पुढे आणलं, या चंदेरी दुनियेत आपला जम बसवायला लागणारा तो सुरुवातीचा अत्यावश्यक असलेला push दिला ….


आज बांग्लादेशात असणाऱ्या बारिसाल ह्या छोट्याश्या खेड्यात १९१४ रोजी अनिल बिस्वास यांचा जन्म झाला ….
वडिलांना असलेलं नाच-गाण्याचं वेड आणि आईकडून मिळालेली शास्त्रीय संगीताची पक्की बैठक यामुळे बालपणापासून अनिलदा संगीतमय वातावरणात वाढले आणि त्यांच्या संगीतात एक नैसर्गिक सहजता आली.

संगीत, गायन, अभिनय, कथा, पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती अशा सिनेसृष्टीतील जवळ जवळ सर्वच क्षेत्रातील त्यांच्या चौफेर कामगिरीमुळे भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचा ते एक भक्कम आधारस्तंभ आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत हा अनिलदांच्या संगीताचा पाया होता …. त्यांच्या संगीतात तबला, ढोलकं, सितार, बासरी आणि पियानोवर विशेष भर असे …. प्रत्येक गाण्यात ते भारतीय वाद्यांचा अत्यंत नजाकतीने, वैशिष्ट्यपूर्ण वापर करत असत ….

सी रामचंद्र, मदन मोहन, रोशन यांच्या सारख्या यशस्वी, दिग्गज संगीतकारांना आणि लता मंगेशकर, तलत महमूद आणि मुकेशसारख्या गायकांना प्रकाशात आणण्याचे श्रेयही अनिलदांकडेच जाते. अनिल विश्वास एकदा अभिमानाने म्हणालेले की “लताचा शोध गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश आणि मी लावला”, आणि त्यांच्या ह्या विधानाचा लतालाही अभिमान आहे. यातच अनिलदांचं विलक्षण वेगळेपण दिसून येतं.

१९४६/४७ साली गुलाम हैदर यांनी अनिल विश्वास आणि लताची पहिल्यांदाच ओळख करून दिली … लता त्यावेळी जेमतेम १६/१७ वर्षांची होती. तिच्या आवाजावर “मल्लिका ए तरन्नुम” नूरजहाँचा प्रचंड पगडा होता. आणि नूरजहाँची त्या काळची लोकप्रियता लक्षात घेता लताच्या ह्या अनुकरणाचेही काही प्रमाणात कौतुक होत असे. पण अनिलदा हे एकमेव संगीतकार होते ज्यांनी लताला नूरजहाँच्या प्रभावातून जाणीवपूर्वक बाहेर काढलं.
आज लताच्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे, नितळ, पारदर्शी, स्वच्छ आवाजामुळे तिला गानकोकिळा हा किताब मिळाला आहे, माझ्या मते तरी याचे पूर्ण श्रेय अनिलदांकडेच जातं.


बापावेगळी पोर, वयाच्या १२/१३ व्या वर्षी कुटुंबाचा भार वहाते म्हणून लताबद्दल अनिलदांना खूपच आत्मीयता होती, अभिमान होता आणि म्हणूनच असेल त्यांनी तिच्यावर धाकट्या बहिणीसारखी माया केली, तिच्या आवाजावर खूप मेहनत घेतली.
त्यांनी लताला गाण्यात, शब्दांच्या स्पष्ट उच्चारांचं किती महत्त्व असतं, गातांना ताल आणि लय तोडल्याशिवाय श्वास कसा घ्यायचा अशा अनेक लहान-सहान पण महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या.

त्यांनी तिला सांगितलं की तू कोणत्याही सप्तकात गायलीस तरी तुझा आवाज मात्र कायम लता मंगेशकरचाच राहिला पाहिजे ही खबरदारी घे.
लता अनिलदांकडे सर्वप्रथम “अनोखा प्यार ” या चित्रपटात गायली आणि ह्या चित्रपटापासूनच दोघांची एक अनोखी, अद्वितीय संगीत सफर सुरू झाली. पण “अनोखा प्यार” चित्रपटात जी मुख्य अभिनेत्री नर्गिस होती तिची गाणी मीना कपूरने म्हटली आहेत तर लताने नलिनी जयवंतची गाणी गायली … ह्या नंतर मात्र अनिलदांनी आपली प्रत्येक उत्कृष्ट रचना लता आणि फक्त लतासाठीच राखून ठेवली ….

दोघांनी हिंदी सिनेसंगीत क्षेत्रात अशी काही बहार आणली की क्या कहने ….. शिकवणारा गुरु जर अनिल विश्वास आणि शिकणारी शिष्या जर लता मंगेशकर असली तर मग जे निर्माण होणार होतं ते केवळ दिव्य स्वर्गीयच असणार होतं …. गजरे, तराना, बेकसूर, जलती निशानी, आरजू, बडी बहू, फरेब, लाडली, नाझ, मेहमान, सौतेला भाई आणि इतर अनेक चित्रपटात या जोडीने जी सुरांची लयलूट केली ती ऐकल्यावर तुम्हाला माझं म्हणणं नक्कीच पटेल ….

तुम्हाला अनिलदा आणि लता या जोडीची माझी सर्वात आवडती ५ गाणी देईन असं म्हटलं खरं, पण गाणी निवडताना मात्र माझी तारांबळ उडाली …..
तराना मधलं “मोसे रूठ गयो मोरा सावरिया” घ्यायचं की “बईमान तोरे नैनवा” घ्यायचं की “तुम्हारे बुलाने को जी चाहता है” , आराम मधलं “मन में किसीकी प्रीत बसाले” घ्यायचं की “बलमा जा जा जा” घ्यायचं इथेच कितीतरी तास मी अडून बसले होते … शिवाय “जा मै तोसे नाही बोलॉ”, “आंखो में चितचोर समाये” आणि “पायल मोरी बाजे रे” यांना तर दुसरा पर्यायच नव्हता … गजरे मधली “प्रीतम तेरा मेरा प्यार” आणि “बरस बरस बदली भी बरस गयी” वर अडून बसले …. मग शेवटी अत्यंत कठोरपणे काही गाण्यांवर काट मारावी लागली.
माफ करा पण आज मी तुम्हाला ५ नाही १० गाणी देणार आहे …. ही देखील कमीच आहेत खरतर पण त्याशिवाय अनिलदांच्या गाण्यांना योग्य न्याय मी देवू शकले नाही असच मला वाटत राहील …




१ ) प्रेम गुपचूप करायचीच गोष्ट असते ……. ते वयच असत चोरून छपून प्रेम करायचं …. जगाला बाहेरून कधीच काहीच कळू न देता …. सारं काही आलबेल आहे, असंच भासवायचं असत इतरांना पण वर-वर शांत दिसणाऱ्या हृदयाच्या आत मात्र प्रेमाचा अंगार धुमसत असतो …… दोन हृदयांना जाळत असतो ….. अख्खं जग झोपत तेव्हा प्रेमी मात्र जागेच असतात …… रात्रभर जागून त्याच्या नावाचा जप करणं, साज शृंगार करून त्याच्या वाटेकडे डोळे लावून खिडकीत हळूच उभं राहाणं. जरासं जरी खुट्ट झालं तरी तोच आला असं समजून लगबगीने दरवाजा उघडणं ….. सारंच किती गोड, त्या कोवळ्या वयात एक हुरहूर लावणारं
“गजरे” मधलं लताने त्या अबोध वयाला साजेश्याच अल्लड, गोड आवाजात म्हटलेलं हे गीत …. गाण्याचं संगीतही अगदी साधं सरळ पण ह्या गीतात असा काही गोडवा आहे की, तासनतास आपण हे गीत गुणगुणत राहतो …..
” प्रियतमा , प्रियतमा हो प्रियतमा
प्रीतम तेरा मेरा प्यार गुपचूप
क्या जाने संसार
प्रीतम तेरा मेरा प्यार …..
राखों के परदे के अंदर
जलता है अंगार चूप चूप
क्या जाने , क्या जाने संसार
प्रीतम तेरा मेरा प्यार ” …..

2 ) प्रेमीजनांची सर्वात आवडीची वेळ म्हणजे रात्रीची …. जेव्हा सगळीकडे नीजानीज होवून सामसूम होते तेव्हाच प्रेमिकांच्या जगात हालचाल सुरु होते आणि मग अशाच एका रात्री घरच्यांची नजर चुकवून, साऱ्या जगापासून स्वतःला लपवत छपवत पियाला भेटायला ती जाते ….. त्याच्यासाठी साजशृंगारही केला आहे….. पण कितीही प्रयत्न केला तरी नेमक्या त्यावेळी साज शृंगारच दगा देतात …. सगळे झोपलेले असताना ऐनवेळी पायातील पैंजण झनक झनक झन करून सार गुपितच फोडतात …. बिंदियादेखील अंधारात अचानक चमकते ….. आणि कुणाला दिसू नये म्हणून घेतलेली चेहरा झाकणारी चुनरिया वारंवार खाली ढळते, जणू ती देखील पियाला भेटायला उत्सुक आहे ….. पण अशावेळी तक्रार तरी कुणाची आणि कुणाजवळ करायची?

” पायल मोरी बाजे बाजे मेरी सखी
पिया मिलन को जाऊ साजनिया
जागे ननदिया और जेठनिया
हेरी पायल मोरी बाजे
झनक झनक झन बाजे झनक झनक झन …. हाय ……
कहो कैसे मिलन हो रे छलिया
ओ बाजे निगोडी पायलिया
काली रतिया बिंदिया चमके
मर गयी रे मै तो मारे शरम के
हो सारी दुनिया के मो पे नजरिया
ओ बाजे निगोडी पायलिया
झनक झनक झन बाजे झनक झनक झन …. हाय ” …..

” पैसा ही पैसा ” मधलं ढोलकीच्या ठेक्यावरच हे एक अफलातून गीत … ह्या गीताच वैशिष्ठ्य म्हणजे शास्त्रीय संगीताने सुरु झालेलं हे गाणं कधी लोकगीताकडे झुकतं कळतही नाही ….. आणि झनक झनक झननंतर लताने अत्यंत हळुवारपणे म्हटलेला तो ” हाय ” ….
त्या एका “हाय” ने गाण्याची लज्जतच वाढवली आहे.
ह्या गीतावरून अनिलदांची प्रतिभाशक्ती लक्षात येते …..

३) गच्च चांदण्यांनी भरलेली रात्र, चहूकडे वसंत फुलला आहे आणि प्रणयोत्सुक प्रेयसी आपल्या प्रियकराला बोलावते आहे ….
” झिल-मिल सितारों के तले,
आ मेरा दामन थाम ले ” …….
का बोलावते आहे काय विचारताय? कारण त्याचीच तर ती कल्पना आहे. अहो, त्याला आपल्या प्रेमात चिंब भिजवून तृप्त करायचं आहे तिला …… म्हणूनच त्याच्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी बरसात झाली आहे ती …..त्याच्या आयुष्यात चांदणं फुलवणारा प्रकाश आणणारी सुहानी रात तीच तर आहे ….

” मैं तेरे दिल की बात हूँ ,
ठहरी हुई बरसात हूँ
कदमों पे जिसके चाँदनी ,
मैं वो सुहानी रात हूँ
झिल-मिल सितारों के तले
आ मेरा दामन थाम ले ” …….

एखाद्या मीलनोत्सुक प्रेयसीने आपल्या प्रियकराला बोलवावं तरी किती आर्जवाने
यातील “खामोश” शब्दावर लताने दिलेलं ताण आणि “मै हुं सराफा इंतेजार” मधल्या इंतजार मधला लांबलेला “जा” एवढा गोड आहे की, हा इंतजार असाच रहावा, संपूच नये असंच वाटतं. गाणं ऐकताना “नाझ” मधलं हे माझ खूप आवडतं हलकं फुलकं प्रणयगीत …. अनिलदांनी संगीतही अगदी साजेसं दिलंय आणि लतानेही त्या षोडश वयाला साजेशा लाडीकपणे ते गायलंय ….

४) प्रेमिकांना रात्र सर्वात जास्त प्रिय असते ……. त्यांना एकमेकांना भेटताना माणसांची जागा नको असते, पण निसर्गातील चंद्र तारांकांची सोबत मात्र हवीहवीशी असते ….. साहजिकच नाही का ते? कारण ह्या चंद्र ताऱ्यांच्या साक्षीनेच त्याचं प्रेम बहरलेलं असतं. त्यांची पहिली लाजरी बुजरी भेट, त्यांच्या शपथा, त्यांचे रुसवे फुगवे ….. साऱ्या साऱ्यांचे तेच तर मूक साक्षीदार असतात …. आणि म्हणूनच ती चंद्र ताऱ्याना सांगतेय …….

” याद रखना चाँद तारों इस सुहानी रात को
दो दिलों में चुपके चुपके जो हुई सो बात को
आसमाँ पर आसमान के प्रेमियों का मेल है
ज़िन्दगी के कॉंने कॉंने में खुशी का खेल है
आरज़ू मचली हुई ये ज़िन्दगी हँसती हुई ” …..

हो लता “कॉंने कॉंने” असंच म्हणते आणि ते “कॉंने कॉंने” ऐकायला इतकं गोड वाटतं की, फक्त त्या एका शब्दासाठी मी हे गाणं हज्जारदा ऐकलं असेन ….. आज जवळजवळ ७ दशके व्हायला आलियेत पण तरीही ही चांद ताऱ्यांची सुहानी रात आजही तुम्हा आम्हा सर्व गानरसिकांना भुरळ घालते. यातच या संगीताचं वेगळेपण आहे. “अनोखा प्यार” मधलं हे लताच्या आवाजातलं गाणं … हे गीत मीना कपूर आणि मुकेशच्या आवाजात पण आहे.


५) असा कसा हा बलमा? समोर सौंदर्याचा अमूल्य खजिना आहे आणि याचं लक्षही नाही? खरंच किती हा नादानपणा ….. त्या मदभऱ्या नजरेतील जादूची काहीच किंमत नाही का? औटघटकेच्या ह्या आयुष्यातले हे मोहरले क्षण असे वाया घालवणं चांगलं का?
कुणावर तरी जीव देणं म्हणजेच आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं हे कोण शिकवणार याला?

” बालमवा नादान
समझाये न समझे दिल की बतियाँ
बालमवा नादान
बालमवा नादान हो नादान ….. हो नादान …… हो नादान …..
बलमा जा जा जा
अब कौन तुझे समझाये
बलमा जा ” …….

“आराम” मधल्या अत्यंत आगळ्या आणि अवघड चालीच्या ह्या गाण्याला हलकं फुलकं फक्त अनिलदाच करू शकतात आणि लताच त्या चालीला, बोलांना पूर्ण न्याय देवू शकते ….

6) एक मुजरा गीत …. पडद्यावर साकारलेल्या नायिकाही अनोळखी ….. पण सुरवातच अशी भन्नाट की हे गाणं लागलं की फक्त डोळे बंद करून ऐकावं.
” जा मै तोसे नाही बोलू
जा मै तोसे नाही बोलू
लाख जतन करले साजन
घुंघटा नाही खोलू
जा मै तोसे नाही बोलू ” …..

अवघड आणि अफलातून शास्त्रीय संगीत असलेल्या ह्या कोठ्यावरच्या गीताला अनिलदांनी एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवलं.
” सौतेला भाई ” मधल्या या गीतात लताने जे आलाप आणि मुरक्या घेतल्या आहेत त्या केवळ अवर्णनीय …. ज्या सहजतेने तिचा आवाज क्षणात वर, तर क्षणात खाली, तर क्षणात गोल गिरक्या घेतो ते फक्त आपण थक्क होवून ऐकत राहतो …..

७) प्रेम म्हटलं की मिलनानंतर विरह अटळ असतो ….. प्रेमाची सत्व परीक्षाच असते ह्या काळात एकमेकांना जाणून घेताना, समजून घेताना कितीही काळजी घेतली तरी जे व्हायचं ते टळत नाहीच …. कधीतरी दुरावा येतोच ….. दोघं वेगळे होतातच … त्याला विसरण्याशिवाय आता कोणताही पर्याय समोर नसतो … पण ज्याला आपलं सर्वस्व मानलेलं होत त्याला असं सहजासहजी विसरणं शक्य आहे का? ….
जेवढा प्रयत्न करतो तेवढीच जास्त आठवण येते अशावेळी …. त्याच्याबरोबर घालवलेला तो धुंद काळ सारखा फेर धरतो. आपल्या भोवती आणि जिवंतपणी मरण म्हणजे काय ते कळत … ते सोनेरी क्षण धूसर होऊन डोळ्यात साठतात आणि मन मग त्या क्षणातंच हरवून ते गेलेले दिवस शोधत राहतं …..

” उन्हें हम जो दिल से भुलाने लगे
वो कुछ और भी याद आने लगे
ज़माना हुआ जिनको बीते वो दिन
घटा बन के आँखों में छाने लगे
वो कुछ और भी याद आने लगे ” …..

” आरजू ” चित्रपटातलं हे कामिनी कौशलवर चित्रित एक आर्त विरहगीत ….

८) दोघांच्या प्रेमाला खरंच कुणाची तरी नजर लागली शेवटी ….. सावरिया नुसता दूर नाही गेला तर रुसला आहे तो तिच्यावर…… ते प्रेमाचे अनुभवलेले क्षण त्या आणाभाका सगळ्या खोट्या होत्या का? निदान रुसव्याचं कारण तरी सांगावं … ती बिचारी प्रेमात असहाय्य होवून त्याला शोधात फिरते …. आजही त्या सावरियातच गुरफटलेल्या मनाला कसं समजवायचं …… सावरिया रुसलाय खरा पण त्यात त्याचा दोष नाहीच आहे …. तिला वाटतंय की तिच्याकडूनच काहीतरी चूक झाली आहे किंवा कुणाची तरी नजर लागलीये त्यांच्या प्रेमाला …..

” मोसे रूठ गयो मोरा साँवरिया
किसकी लगी आय-हाय किसकी लगी जुल्मी नजरिया
काहे को रूठ गये क्या है कुसूर मेरा
किस बिध माने ना दिल मजबूर मेरा
इसे ले के चली आई पिया तेरी नगरिया
किसकी लगी आय-हाय किसकी लगी जुल्मी नजरिया ” …..
यात मधुबाला एखाद्या लहान मुलीसारखी निरागस दिसते …. आणि लताचा “आय हाय” म्हणतानाचा सूर देखील भाबडा अगदी लहान मुलासारखा ……
“तराना” मधलं खूप आवडतं गाणं आहे हे माझं

९) कायम नजरेतच राहणारा आणि तरीही चुकूनही कधी दर्शन न देणारा तो चित्तचोर ….. कितीही प्रयत्न केले तरी प्रत्यक्ष येतही नाही आणि हृदयातून काही केल्या जातही नाही …. त्याची आठवण मनाचे तार छेडते ….. “सखे, मनाला तरसावणारा, तडपवणारा आणि तरीही मनमीत म्हणवणारा असा कसा गं हा चित्त चोर ? ”

अनिलदांची एक अजरामर संगीतरचना …..
” आंखो में चितचोर समाये
आंखो को न दरस दिखाये
किये अनेक अनेक उपाये
न आये ना दिल से जाये ” ……

सुरुवातीला येणारे अत्यंत मोहक बासरीचे सूर आणि मग हलकेच background ला सुरु होणारा ढोलकी सारखा आवाज …. आणि अचानक कीर्तन ऐकत असल्यासारखा फील येतो ….
त्याचं कारण म्हणजे ह्या गीतात, बंगाली लोकगीतांमध्ये वाजवले जाणारे एक “खोल” नावाचे (मृदंगासारखे) वाद्य वापरले आहे ….

” मन में बैठा ऐसे वो
जो दिल के तार हिलाये ” ….
यातील “वो” वर लताचा आवाज असा काही फिरला आहे की क्या कहने ….
” जैसे भिगी रात में कोई
छुपकर बीन बजाये
सखी री ” …..
आणि “सखी री” …. शब्दावरची ती लाजवाब मुरकी ….
” मन को तरपाये, तरसाये
फिर भी मन का मित कहाये
आंखो में चितचोर समाये ” ……

ह्या गीताचा बाज “baul” ह्या प्रकारच्या बंगाली लोकगीताचा आहे … ह्या गीताला एवढ्या आगळ्या प्रकारे संगीत दिलेलं आहे की माझ्यासारखी संगीतातले बारकावे फारसे न कळणारी फक्त ही रचना कानात साठवत राहते …… आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा हे गाणं ऐकताना दरवेळी गाण्यातील एखादी नवीन जागा कळते आणि थक्क व्हायला होतं ….

१०) पण खरं, प्रेम विरह, गैरसमज, ताटातूट या सर्वांना पुरून उरत आणि शेवटी दोन प्रेमी जिवांच मिलन कोणीही थांबवू नाही शकत …..
आज मिलनाची ती रात्री, तो क्षण जवळ आला आहे ……. ती सर्वांच्या नजरा चुकवुन कशीबशी येवुन पोहोचली एकदाची. आणि तो? तो तर कधीचा येवुन उभा होता आतुरतेने वाट पहात …..

” सितारो चांद से कहदो ये दिल की बात धीरेसे
मिलन की रात है गुज़रे मिलन की रात धीरे से ”
रात्रीचा धुंद करणारा एकांत, आजुबाजुला कुण्णीकुण्णी नाही म्हणुन जरा कुठे आश्वस्त होतेय. तो काय पहाते!! चंद्र टक लावून अनिमिष नेत्रांनी त्यांनाच पहातोये. तिच्या मनीचं गुपीत कसं सांगणार ती तिच्या साजणाला ह्याच्या समोर? …. हार मानुन मग तिने आकाशात दाटुन आलेल्या मेघांना विनवलं …..

” अरी बदली छुपा ले दो घड़ी चंदा को दामन में
चंदा को दामन में
पिया से आज कहनी है मुझे एक बात धीरे से
मिलन की रात है ” …

पण तिला वाटत होतं तसं हे चाँद, सितारे, बदली काही नुसते त्यांचं मिलन पहायला जमले नव्हते, तर तिचं मनोगत जाणुन तिला मदतही करणार होते …
आपल्या या लाजर्या बुजर्या सखीसाठी वातावरण जादुई करणार होते … आणि म्हणुनंच हलकीच एक सर आली आणि दोघांनाही चिंब करुन त्या सुगंधी रात्रीने तृप्त केले ……

” अभी दिल ही में दिल कि बात थी पर जान ली तुमने
घटा छाने से पहले हो गयी बरसात धीरे से
मिलन की रात है गुजरे मिलन की रात धीरे से ” …

“बडी बहू” या चित्रपटातील लताने गायलेलं आणि अनिल विश्वास यांनी संगीतबद्ध केलेलं हे दुर्मिळ पण अत्यंत गोड असं माझ सर्वात आवडतं प्रणय गीत ….अनिलदांमुळे लता नावारूपाला आली की, लता मुळे अनिलदां आपली प्रतिभा उत्कृष्टपणे सर्वांसमोर आणू शकले हे कुणीच नाही ठरवू शकत ….
पण एक मात्र नक्की की ह्या दोन दिग्गजांच्या एकत्र येण्यामुळे हिंदी सिनेसंगीतात अमृतधारा बरसल्या ज्या अजूनही आपल्यासारख्या चातकांना तृप्त करत आहेत …..
=============
आज जवळ जवळ विस्मृतीत गेलेली ही अभिनेत्री … आजच्या पिढीला हिची ओळख सांगायची तर ” चेन्नई एक्सप्रेस ” मध्ये शाहरुखच्या आज्जीचं काम जिने केलय ती कामिनी कौशल….

पण ४० च्या दशकात ती एवढी लोकप्रिय होती की एकेकाळी फक्त अशोक कुमार सोडून, अगदी दिलीप कुमार आणि देव आनंद असले तरीही त्यांच्या बरोबर केलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या नामावलीत तिचं नाव सर्वात पहिलं येत असे…..
लताने “जिद्दी” मध्ये कामिनी कौशलला आवाज दिला होता. खरंतर लताने सर्वप्रथम ज्या व्यावसायिक नायिकेसाठी गीत गायले ते होतं ” जिद्दी ” मध्ये कामिनी कौशल साठी…. त्याआधी लताची सगळी गाणी एखाद्या side actress किंवा दुय्यम characters साठी होती. पण ” जिद्दी ” चित्रपटाच्या गाण्यांवर मात्र गायिकेच नाव ” आशा ” असं दिलं आहे. कारण “महल” चित्रपटाच्या आधी गाण्यांच्या रेकॉर्ड्स वर गायकांच नाव द्यायची पद्धत नव्हती…..म्हणून ” जिद्दी ” चित्रपटाच्या गाण्यांवर गायिकेच नाव ” आशा ” असच आहे …. आशा हे ” जिद्दी ” मध्ये कामिनी ने जी भूमिका केली आहे त्या character च नाव आहे …. ” जिद्दी ” देव आनंदचाही पहिलाच व्यावसायिक रित्या यशस्वी ठरलेला चित्रपट.

झांझर, पूनम, नादिया के पार,  आस, जिद्दी, आरजू, नमूना, शायर अशा अनेक चित्रपटात लताने कामिनी साठी अनेक अप्रतिम गीतं गायली आहेत…..अत्यंत बोलके डोळे , नाजूक, भावदर्शी चेहरा आणि कमनीय बांधा असलेल्या कामिनीने लताच्या सर्वच गाण्यांना योग्य न्याय दिला आणि सिनेरसिकांच्या मनात या गाण्यांना एक वेगळंच स्थान मिळवून दिलं…खरतर तिची बहुतेक सर्वच गाणी अप्रतिम आहेत. पण मी त्यातल्या त्यात कामिनीची लताने गायलेली ही पाच गाणी निवडली जी मला जास्त आवडतात….






१) एक नाजूक फूल हळुवारपणे उमलतय…… आम्रवृक्षावर कोकीळ कुहू कुहू गातेय…. मग कुणाचं मन थाऱ्यावर राहील?
अशात तिचे डोळे देखील तिला फितूर आहेत… तिची अधीरता हसत हसत सांगतात ….
आणि तिची आतुरता बघून हवा देखील तिची छेड काढते…..
आणि पायातले पैंजणही तिला न जुमानता छुन छुन च्या तालावर वाजू लागतात
मग ती आपल्या बालमाची मनोहर छबी डोळ्यात साठवून त्याची मनधरणी करते….
कारण अशा या नाजूक क्षणी एकटेपणा दूर करण्यासाठी साजण हवाच हवा…..
आणि म्हणूनच ती त्याला बोलावत आहे

” ओ भोले बालमा, ओ मोरे साजना, आ ऽ ऽ आ ऽ ऽ
घुँगर बाजे छुन छुन, डुंगर बाजे डुम डुम
अम्बुवा की डाल पे कोयल का शोर,
सपनों की छाँव में नाचे मनमोर
ऐसे में अखियाँ भी बोलने लगी,
हँस हँस के राज़ दिल के खोलने लगी
आते जाते छेड़ती है चंचल हवा,
बैरी तेरे बिना, सूना है ये समाँ, आ ऽ ऽ आ ऽ ऽ
घुँगर बाजे छुन छुन ” …

या गीतातील कामिनीचे हावभाव खूप निरागस आणि गोड आहेत
यात घुंगर बाजे छुन छुन नंतर डुंगर बाजे डुम डुम म्हणतानाचा लताचा आवाज जेवढा अवखळ आहे तेवढीच कामिनी देखील पडद्यावर अल्लड दिसते

” पूनम ” मधलं हे अतिशय गोड गाणं … यात कामिनीचा बलमा त्या काळचा सुपरस्टार अशोक कुमार होता….



२) इतक्या आर्जवाने तिने बोलावल्यावर तिचा बलमा येणार नाही असं होईल तरी का ?
तिच्या लाडिक आग्रहाला पाहून, तिच्यावर भुलून तिचा बलमा आलाच आणि त्याला पाहून ती देखील मनोमन आनंदली आहे
आकाशात तर चंद्र आहेच पण तिचा चंद्र देखील आत्ता या घटकेला तिच्या समोर आहे…….
चहूकडे त्यांच्या प्रेमाचं चांदणं पसरलं आहे आणि त्या प्रेमाच्या चांदण्यात ती मदहोश होऊन गातेय, नाचतेय….

” मैं नाचू , प्यार नाचे , मेरा सिंगर नाचे
तारो ने साज छेडा, दिल की पुकार नाचे ” ….

मदमस्त रात्र , त्याने छेडलेला साज आणि त्यावर तिचं तनमन डोलतंय …
कामिनीच्या रोमरोमातून जाणवणारा अवखळपणा लताच्या गोड गळ्यातून पुरेपूर उतरला आहे …
आपला बालम ( अशोक कुमारच ) सोबत असल्याने कामिनीच्या चेहऱ्यावरून आनंद नुसता ओसंडत आहे..

” झुमे झुमे दिल मेरा, झुमे झुमे दिल मेरा
चंदा की चांदनी में झुमे झुमे दिल मेरा ” ….

” पूनम ” चित्रपटातल हे आणखीन एक सुरेल गाणं



३) प्रेमात हरवलेले ते दोघंजण …. एक जण जरी काही करणानिमित्त दूर गेला तर दुसरा किती हवालदिल होत असेल ना … विचार सुद्धा सहन होत नाही विरहाचा आणि म्हणूनच ती विनविते आहे की नजरे समोरून गेलास पण हृदयातून दूर जाऊ नकोस ….

” जाना ना दिल से दूर आँखों से दूर जाके
नाज़ूक बहुत है देखो, नाज़ूक बहुत है देखो
दिल हो न ग़म से चूर आँखों से दूर जाके ” …

बिचारी स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत घालते आहे ….
आपण लांब जरी असलो ना तरी मनाने एकमेकांच्या जवळच आहोत …..
जग निर्दयी आहे… कधी घाला घालेल काहीच भरवसा नाही….
आणि म्हणूनच रुसवे फुगवे दूर ठेवून विश्वास ठेवायचा आहे एकमेकांवर
की आपण आज जरी एकमेकांपासून लांब असलो तरी परत नक्कीच भेटणार आहोत …..

” उल्फ़त को तुम निभाना मुझसे न रूठ जाना
ज़ालिम है यह ज़माना, दिल तो है बेक़सूर
जाना ना दिलसे दूर आँखों से दूर जाके ” ….

लताच्या आवाजातील आणि कामिनीच्या चेहऱ्यावरील आर्जवामुळे आपणही हे गाणं ऐकता ऐकता त्यांची ताटातूट होवू नये म्हणून मनोमन प्रार्थना करतो…. ” आरजू ” चित्रपटातल हे माझ अतिशय आवडत गीत …. यात कामिनी बरोबर दिलीप कुमार आहे .



४) प्रेमात विरह आला की मग हातात उरत फक्त वाट पाहणं…..
त्याच्या आठवणींमध्ये रमायचं आणि स्वत:चीच समजूत घालत बसायचं…..

” तेरे खयाल को दिल से लगाये बैठे हैं
हम इंतजार की घड़ियाँ सजाये बैठे हैं
मुहब्बत पर बहार आती जहाँ गुलझार हो जाता
अगर बेताब नजरों को तेरा दीदार हो जाता “…..

त्याच्याबरोबर अनुभवलेले ते धुंद क्षण, तो काळ परत परत आठवायचा आणि आयुष्यात परत एकदा जरी नजरे समोर आपला प्रियकर दिसला तरी आयुष्य परत एकदा रंगतदार होईल अशी जर तर ची स्वप्नं पहात एक एक दिवस पुढे ढकलायचा ……

” मेरे दिल की ख़ुशी बनकर अगर तुम सामने आते .. सामने आते
मिला है दिल से दिल ये भी सहारा कम नहीं मुझको …. कम नहीं मुझको
नजर से जब नजर मिलती तो बेडा पार हो जाता
मुहब्बत पर बहार आती जहाँ गुलझार हो जाता ” …..

आज जरी एकटेपणा असला तरी कोणे एके काळी दोघांच मिलन झालेलं हे सुखही अशावेळी खूप दिलासा देतं …पण तेच सुख आता परत हवं असत….खरंच अशावेळी त्याच्या परत भेटीच्या आशेमुळेच वाट्याला आलेला विरह सुसह्य होतो ….. ” शायर ” मधलं हे गीत तुम्हालाही नक्कीच आवडेल ….






५) पण कितीही ठरवलं तरी अखेर कायमची ताटातूट झालेलीच असते…… किती आणि कुठवर वाट पहायची…..या प्रतीक्षेला अंत आहे का ?
नशिबालाच मग प्रश्न विचारला जातो की जगायचं की मरायचं ते तरी कळू देत…
कधी कधी एका आशेवर माणूस पूर्ण आयुष्य काढतो… कोणाच्या तरी येण्याची अशा….
शेवटच एकदा डोळे भरून त्याला बघण्याची आशा
पण जर तो येणारच नसेल तर मग हा वसंत तरी का आलाय?
हा बहर सुकून का जात नाहिये माझ्या सारखा?

” कहाँ तक हम उठाएं ग़म जियें अब या के मर जाए
अरे ज़ालिम मुक़द्दर ये बता दे हम किधर जाए…..
हम उनका नाम लेकर काट देंगे ज़िंदगी अपनी
न वो आए मगर मिलने का कर वादा तो किधर जाए…..
पपीहे से कहो गाये न वो नग़मे बहारों के
कहो गुलशन उजड़ जाए कहो कलियाँ बिखर जाए”…..

कामिनीचा व्याकूळ चेहरा आणि लताचा काळजाचा ठाव घेणारा आवाज…. गाणं ऐकताना कधी डोळे भरून येतात कळतंच नाही…. ” आरजू ” मधलंच आणखीन एक सदाबहार गीत ….

आज जरी कामिनी विस्मृतीत गेलेली अभिनेत्री असली तरी त्याकाळची तिची लोकप्रियता पाहता सुरुवातीच्या काळात लताला लोकप्रियता मिळवून देण्यात कामिनीवर चित्रित गाण्यांचा फार मोठा हात होता हे नाकारता येण शक्यच नाही.
=================
” ल ता मं गे श क र ” …… सात अक्षरं …. सप्त सूर …..

रसिकांच्या जवळ जवळ तीन पिढ्या एकाच सुरेल सप्तसूरांच्या धाग्यात ओवल्या गेल्या आहेत आणि तो धागा आहे ” लता मंगेशकर “
गेली कित्येक वर्ष हा आवाज गातच आहे ….. गातच आहे ….. गातच आहे …..

स्वर्गातून अवतरलेल्या ह्या स्वरगंगेच्या अविरत सूरधारांनी आजवर लाखो करोडो संगीत रसिकांचे कान व अंतःकरण तृप्त केले आहेत .
लताच्या आवाजाला आता खरंतर कोणतीच उपमा शिल्लक उरली नाहीये. लताचा आवाज हा फक्त आणि फक्त लतासारखाच होता, आहे आणि या पुढेही असणार आहे …. कारण लताला उपमा नाही हे देवाघरचे देणे ….


तर अशा या अद्वितीय, उत्तुंग व्यक्तिमत्वाने या वर्षी म्हणजेच २०१७ साली संगीत क्षेत्रात व्यावसायिक रित्या थोडी थोडकी नव्हे तर ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. आज ७५ वर्षे ह्या अनभिषिक्त गानसम्राज्ञीच्या स्वरधारांचा अखंड स्रोत, ऐकणाऱ्याचा कण न कण व्यापून टाकतो. कधीही, कुठेही आणि कितीही गाणी ऐका लताची. ऐकणाऱ्याचं समाधान होत नाही आणि म्हणूनच ह्या व्यावसायिक पंच्याहत्तरीच औचित्य साधून लताच्या काही गाण्यांची एक सफर तुमच्या बरोबर करायच ठरवलं.

लता मंगेशकर आणि गुलाम हैदर

पण लताची संगीत कारकीर्द एवढी प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण आहे कीतिची गाणी निवडणं म्हणजे डोळे दिपवणाऱ्या रत्नांनी खच्चून भरलेल्या खाणीतून एक एक रत्न शोधणं. बरं, सगळीच रत्न अमूल्य, सगळीच हवीहवीशी, कुठलं उचलू आणि कुठलं नको.

पण कुठून तरी सुरुवात करायलाच हवी होती. मग ठरवलं की तिला या प्रवासात अगदी सुरुवातीपासून साथ देणारे २५ गीतकार, २५ संगीतकार आणि २५ नायिका निवडून त्यांचं एक एक गाणं घ्यायचं.

पण परत यात एक अडचण आली. यातील प्रत्येकाबरोबरची तिची कामगिरी एवढी अफाट आहे की त्यांचं मला एकच एक गाणं निवडता येईना. म्हणूनच मग प्रत्येकाची पाच गाणी घेतली. म्हणजे त्यांनाही थोडाफार न्याय देता येईल आणि आपली सफर देखील जास्त रंगतदार होईल.




कोणतंही कार्य करताना ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सर्वप्रथम गजाननाची नांदी करायची पद्धत आहे.
चला तर …… आपणही आज सर्वप्रथम नांदी करणार आहोत …..

कुणाची नांदी?

अहो लताच्या हिंदी संगीतातील यशस्वी वाटचालीची नांदी ज्याने केली त्याची अनेक लता प्रेमींना माहीतच असेल १९४२ मध्ये अवघ्या वयाच्या १३व्या वर्षी तिच्या वडिलांचं, मास्टर दीनानाथ मंगेशकरांच निधन झालं आणि आपल्या कुटुंबाचं पोषण करण्याची जबाबदारी सर्वात मोठ्या असणाऱ्या लतावर आली .

मास्टर विनायकांनी तिला १९४२ मध्ये “पहिली मंगळागौर” या मराठी चित्रपटात छोटीशी भूमिका दिली. त्यातलं “नटली चैत्राची नवलाई” हे तिने पडद्यावर साकारलेलं पहलं वहिलं मराठी गीत. तिचं पाहिलं हिंदी गाणं देखील १९४३ मध्ये आलेल्या “गजाभाऊ” ह्या मराठी सिनेमातलं आहे .

छोट्या छोट्या भूमिका करून आणि गाणी म्हणून लता आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत होती. पण म्हणावा तसा break मात्र अजून मिळत नव्हता…. आणि तो तिला मिळवून दिला गुलाम हैदर यांनी .

“शहीद” चित्रपटासाठी पार्श्वगायिका म्हणून त्यांनी शशधर मुखर्जींना लताच नाव सुचवलं. पण, मुखर्जींना लताचा आवाज तेव्हा खूपच नाजूक आणि पातळ वाटला आणि त्यांनी तिला नाकारलं .
त्यावर चिडून गुलाम हैदार म्हणाले की “आज जिला तुम्ही नाकारत आहेत उद्या तिने आपल्या चित्रपटात गावं म्हणून तुम्ही भीक मागाल” आणि त्यांनी तिला आपल्या “मजबूर” ( १९४८ ) या चित्रपटात पहिला ब्रेक दिला. लतानेही आपल्या mentor च हे वचन शब्दशः खरं करून दाखवलं .

” गुलाम हैदर हे खऱ्या अर्थाने माझे गॉडफादर होते. कारण मी नवखी असताना तेच सर्वात पहिले संगीतकार होते ज्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला” असं म्हणून लता आजही त्यांचं हे ऋण मान्य करते.

म्हणूनच आज जरी गुलाम हैदर सर्वांच्या विस्मृतीत गेले असले तरी एक दिव्य आवाज आपल्या समोर आणल्याबद्दल संपूर्ण सिनेजगत आणि संगीतरसिक नक्कीच त्यांचे कायमचे ऋणी राहतील . दुर्दैवाने त्यांचे १९५३ साली निधन झालं .

लता त्यांच्याकडे “पद्मिनी” आणि “मजबूर” अशा फक्त दोनच चित्रपटात गायली ….पण गुलाम हैदर मुळेच संगीत जगताला एक अनोखं रत्नं मिळालं …..



मजबूर ( १९४८ ) मधील
“दिल मेरा तोडा, मुझे कहींका ना छोडा”
हे लताचं पदड्यावर खऱ्या अर्थाने हिट झालेलं पाहिलं गाणं

पद्मिनी ( १९४८ ) मधील
“बेदर्द तेरे दर्द को सिने से लगाके
रो लेंगे तसव्वूर में तुझे पास बिठाके”

हे गाणं देखील खूप गाजलं आणि लता नावाच्या चांदणीचा, अहं पौर्णिमेच्या चंद्राचा सिनेसंगीताच्या क्षितिजावर उदय झाला .

आणि म्हणूनच आपण आज गुलाम हैदर यांच्या नांदीने ह्या सूरसफरीची सुरुवात केली….

तर मग येताय न माझ्याबरोबर ?
चला तर, तिच्याच जादुई स्वरांच्या गालिच्यावर बसून सुरु करू हीअदभूत सफर..त्या निमित्ताने गतकाळातील अनेक स्मृत आणि काही विस्मृतीत गेलेल्या अप्रतिम रचनांचीही आपसूक उजळणी होईल .

तयार रहा पुढच्या आठवड्यात ह्याच ठिकाणी ह्याच वेळी लताच्या सूरमयी दुनियेत भरारी घ्यायला …..
=======

No comments:

Post a Comment